CM Maharashtra: MPSC परीक्षा आठवड्या भरातच; तर राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर - मुख्यमंत्री यांनी साधला जनतेशी संवाद

                                      file image



भारतीय अलंकार 24

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर होताच, आज राज्यात उलट प्रतिसाद उमटले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी समाज माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने MPSC परीक्षा आणि कोरोना स्थिती बाबत ते बोलले.


Mpsc परीक्षा रद्द करण्यात आली नसून, काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे.  उद्या परीक्षेची तारीख घोषित करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी उगाच कोणी भडकवित आहे म्हणून,भडकू नये. कोविड कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. कारण परीक्षा घेण्यास यंत्रणा लावावी लागते. हा कर्मचारी वर्ग सध्या कोविडच्या रोखण्यासाठीच्या कार्यात सज्ज आहे. या कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट देखील करणे आवश्यक आहे. कारण, विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर त्यावर कोणतेही दडपण नको. याशिवाय वयोमर्यादा ही अट आडवी येणार नाही,असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले.




राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जगभरातील इतर काही देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे. आपल्याला लॉकडाऊन करायचे नाही, पण त्यासाठी जननेते कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जगात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट मोठी आहे, तशी लाट आपल्याकडे येऊ नये यासाठी सगळ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. पण लगेचच लॉकडाऊन केले जाईल असे नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 



जिथे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत तिथे जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. पण संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय परस्पर घेऊ नये असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. राज्यात सापडणारे ८० टक्के रुग्ण हे लक्षणं नसलेली आहेत. त्यामुले अनेक जण कोरोना असूनही बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही लोक कोरोनाची चाचणी करणे टाळत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घरात रुग्ण असूनही लोक ते लपवत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण लोकांनी असे काही न करता सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, यामुळे ते आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवू शकतील असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.



टिप्पण्या