Lockdown:टाळेबंदीला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा - वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

टाळेबंदीला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा - वंचित बहुजन आघाडीचे आवाहन


अकोला दि. ३१ : कोरोनाचे नावावर देशातील लोकशाही कुलूपबंद करण्याचा सरकारचा डाव असून नागरिकांच्या जगण्यावर बंधने आणली आहेत.जनतेला टाळेबंदी नकोय म्हणून सामान्य जीवन जगण्यास प्रारंभ करावा, ही भूमिका एड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी घेतली आहे.सबब व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार, टपरीधारक, फेरीवाले, रिक्षा ऑटो रिक्षा ह्या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेच्या उपाय योजनांसह आपले दैनिक व्यवहार सुरु करून सरकारची ही दडपशाही अमान्य करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे.  

जनता मेटाकुटीला आलेली असताना सरकारने सहावा लॉकडाउन जाहीर केला आहे.गोरगरीब जनतेच्या जगण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना शून्य असून वाढता मृत्यदर आटोक्यात आणण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.देशात केवळ ३ टक्के मृत्युदर असून मृत्युदर कधीही शून्य असू शकत नाही.त्यामुळे सरकार आणि चॅनेल्स भिती घालण्याचे काम करीत आहेत.कोरोना पूर्वी आणि कोरोना नंतर होणारे मृत्युदर तपासला असता असे लक्षात येते की कोरोना आधी मृत्युदर हा आताच्या मृत्युदरा पेक्षा १८ टक्के अधिक होता.त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता जनतेने आपले सण, दैनिक व्यवहार सुरळीत सुरु करणे गरजेचे आहे. व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार,टपरीवाले, फेरीवाले,रिक्षा ऑटो रिक्षा ह्या सहीत सर्व नागरिकांनी आपले दैनिक व्यवहार प्रारंभ करावा.सरकारची ही दडपशाही अमान्य करावी.आपापली दुकाने उघडी करावी. जनतेने देखील शारिरीक अंतर, मास्क व सॅनिटायजर चा वापर करीत खरेदी आणि सण साजरे करणे, सामाजिक सौहार्द आणि स्वास्थ टिकविण्यास प्रारंभ करावा.

येणारे सण साजरे करण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सरकारने सुरु करावी.तसेच सरकारने शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे.सरकार युरोपियन मॉडेलवर चर्चा करते.परंतु आशिया खंडातील चीन, भूतान, म्यानमार ह्यांनी कोरोना कश्या पद्धतीने आटोक्यात आणले ह्यावर सरकार बोलत नाही.लोक मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहेत.त्यांचे रोजगार हिरावले जात आहेत.देशातील जनतेच्या हितासाठी लस बाजारात आणावी किंवा उपायपयोजना आखाव्यात, हे करण्याऐवजी  लॉकडाऊन करीत आहे.

एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने व्यापारी, फेरीवाले, लहान व्यवसायी,नौकरदार ह्यासह सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.तारखेपासून पक्षाचे कार्यकर्ते " मी हा लॉकडाउन मानत नाही" हा निर्धार करून बाहेर पडणार आहेत.जे व्यवसायी आपले व्यवसाय करू इच्छितात त्यांना व्यापार व व्यवसाया करीता पोलीस आणि प्रशासनाचा त्रास होऊ दिला जाणार नाही.त्यासाठी प्रखर आणि लढण्याची भूमिका वंचित घेत आहे.जनतेने देखील टाळेबंदी झुगारून लावावी आणि आपले जीवन सामान्यरित्या प्रारंभ करावा,  असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीने केलं आहे.

टिप्पण्या