Employment: कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार!

मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे.


मुंबई, दि. २६ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मंत्री श्री. मलिक म्हणाले, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६० तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार ०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला आहे.

ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार नोकरीइच्छुक सहभागी

कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत. झालेल्या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ४० हजार २२९ नोकरीइच्छुक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

नोकरीइच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मंत्री श्री. मलिक म्हणाले, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छुक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

........


टिप्पण्या