BJP: पंचनाम्याचे दुबार नाटक कशासाठी; तेजराव थोरात यांनी केला सवाल

वास्तविक पाहता शेतक-यांचे लाखोंच्या घरात नुकसान झालं. तिथे दहा हजार रूपयांनी होणार तरी काय ? मात्र, ही सुध्दा मदत केल्यानंतर अनेक प्रकारचे नाटकं सरकार करत असून, शेतक-यांना मदत देण्याची त्यांची नियत नाही.




अकोला: विदर्भ व मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांच्या संसारावर नांगर फिरल्यागत अवस्था झाली. सरकार दुस-यांदा पंचनामे करून नेमकं काय करतं आहे ? हा प्रकार म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखाच आहे. हे नाटक करण्यापेक्षा शेतक-यांचा सातबारा पहा आणि सरसकट आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजपाचे राज्य  प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात यांनी केली आहे.



यासंदर्भात थोरात यांनी दिलेले प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की,  यंदा महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाला. परतीच्या पावसाने कहर  केला. विदर्भ-मराठवाडा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज खरीप पिकांचे पूर्णतः शंभर टक्के एवढे नुकसान झाले आहे. 



विदर्भ  मराठवाड्यात नाही, म्हटलं तरी तीस लाखापेक्षा अधिक हेक्टर शेती नुकसानीत आली. केवळ पिके वाया गेली असं नव्हे तर जास्त पाऊस पडल्याने   अनेक ठिकाणी जिल्ह्यात चक्क शेतक-यांच्या जमिनीच खरडून गेल्या आहेत. सोयाबीन,कापूस, मका, तूर कुठलंही पीक पदरात पडलं नाही. खरं तर पहिल्या टप्प्यात शासनाने नुकसानीचे पंचनामे केले होते आणि त्या आधारावर दहा हजार रूपयांची घोषणा शेतक-यांना मदत म्हणून सरकारने केली. 



वास्तविक पाहता शेतक-यांचे लाखोंच्या घरात नुकसान झालं. तिथे दहा हजार रूपयांनी होणार तरी काय ? मात्र, ही सुध्दा मदत केल्यानंतर अनेक प्रकारचे नाटकं सरकार करत असून, शेतक-यांना मदत देण्याची त्यांची नियत नाही ? हे आता स्पष्टपणे लक्षात येत आहे,असा आरोप थोरात यांनी केला.



दुस-यांदा पंचनामे करा आणि पुरावे सादर करा अशा प्रकारचा आदेश सरकारने काढणे, म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारने विदर्भ मराठवाड्यातील  शेतक-यांना सरसगट मदत देताना पंचनाम्याचे नाटक बाजूला ठेवावेत.आणि सातबारा बघा,शेतक-यांना घोषणा केल्याप्रमाणे आर्थिक मदत द्यायला सुरूवात करा, अशी मागणी भाजपाचे    तेजराव थोरात यांनी केली आहे.खरं तर दिवाळी पूर्वी जर मदत केली तर कशीतरी दिवाळी शेतक-यांना गोड लागेल असेही  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



टिप्पण्या